आषाढी एकादशी

 महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी *आषाढी एकादशी* निमित्त अठ्ठावीस युगे कर कटावरी ठेवून उभ्या असणाऱ्या विठुरायाकडे विठूमाऊली कडे महाराष्ट्राच्या कल्याणाचे साकडे घातले.

मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी लढवय्या सेनापतीच्या भूमिकेतून कोरोनारुपी संकटामध्ये महाराष्ट्राचे खंबीरपणे नेतृत्व केले आहे ते पाहता आज विठुरायाच्या दर्शनाने त्यांच्या मनी

*भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद* हे भाव आले असणार हे नक्कीच.

*शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी* या प्रमाणे प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीचा, कार्यकर्तृत्वाचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचा वारसा मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी  आपल्या खंबीर, संयमी आणि शांत स्वभावाने सिद्ध करून दाखवला आहे.

*आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही त्याचा वास वाऱ्याबरोबर आसमंतात पसरत असतो*

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून  मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची, मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत असताना कोठेही आपल्या वाणी आणि विचारावरचा ताबा सुटू दिलेला नाही. 

संत तुकाराम महाराजांच्या भाषेतच म्हणायचे तर,

*घासावा शब्द। तासावा शब्द। तोलावा शब्द बोलण्यापूर्वी*

*ठेवावे भान। देश,काळ पात्राचे।बोलावे बरे| बोलावे खरे*

माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी *संकट गंभीर सरकार खंबीर* म्हणत खऱ्या अर्थाने या संकटाला खंबीरपणे तोंड देत महाराष्ट्रातील जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. म्हणूनच *बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले* असे म्हणावेसे वाटते. 

पंढरीचा विठ्ठल, पांडुरंग हा सर्वांची माऊली आहे. माऊलीच्या मायेने हा संतांचा, वारकर्‍यांचा मेळा जपला आहे. तसेच मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना संकट काळामध्ये कधी प्रेमळ, कधी थोडे रागावून, कधी मायेने समजावून घेत, तर मायेने समज देत जबाबदार कुटुंबवत्सल, प्रेमळ कुटुंब प्रमुखाची भूमिका घेतली आणि त्याच मायेने या महाराष्ट्राला कुशीत घेऊन पंढरीच्या विठुराया कडे *तुझी कृपादृष्टी आम्हावर राहू दे* हे साकडे घालत आहेत.

लॉकडाऊन मध्ये जरी प्रार्थनास्थळे बंद असली आणि वर्षानुवर्ष अविरतपणे चालू असलेली वारी परंपरा या संकटामुळे खंडित झाली असली तरीही पंढरीच्या विठुरायाचे रूप आपल्याला कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या प्रत्येक समाजसेवकामध्ये दिसून आले.

म्हणूनच त्या विठुराया कडे एकच मागणे आहे

*हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी*

  आज ज्या लालपरीने पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले त्या लालपरी बसचे चालक मुस्लिम समाजाचे आहेत. अठरा पगड जातींना एकत्र घेऊन भागवतधर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन *सर्वधर्मसमभावा* चा संदेश वारकरी संप्रदायाने आणि संत शिकवणुकी ने महाराष्ट्राला दिला आहे. याच सर्वधर्मसमभावाचे दर्शन आजही आपल्याला होताना दिसते. 

*विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म|भेदाभेद भ्रम अमंगल|*

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या *हे विश्वची माझे घर* याप्रमाणे संपूर्ण जगावर पसरलेले हे कोरोनारुपी संकट लवकर दूर होऊन मनुष्य कल्याणाचे कार्य सर्वांच्या हातून घडावे हीच त्या विठुरायाच्या चरणी विनम्र प्रार्थना🙏🙏

*आले अस्मानी संकट वेठीस राहिली धरा । घ्यावे नाम माऊलीचे विठू विश्वास आसरा*

प्रा. विद्या संतोष होडे

(एम ए. एम एड.डीएसएम,बीजे-प्रिंट मीडिया )

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?