विज्ञान शाप की वरदान

 शालेय जीवनापासून एक निबंध हमखास लिहायला असायचा *विज्ञान शाप की वरदान* 

मग एका विषयाच्या दोन्ही बाजू मांडत असताना विज्ञान मानवाला वरदान कसे ठरले आहे आणि विज्ञानाचा मानवाने केलेला अतिरेक त्यालाच शाप कसा देत आहे या दोन्ही बाजू मांडल्या जायच्या.  काळाच्या ओघात विज्ञानामध्ये नवनवीन टप्पे येत गेले बदल घडत गेले आधुनिक तंत्रज्ञान आले आणि आजच्या या २०२० मध्ये ज्यावेळेस भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे, तरुणांचा देश म्हणून प्रगतीपथावर जात आहे त्याच वेळेस एक असा विषय समोर आला की ज्यांनी  मानवाच्या प्रगतीची, मानवाच्या उत्तुंग भरारीची, मानवाने विज्ञानाच्या साथीने निसर्गावर केलेल्या आक्रमणाची सर्व पंख छाटून टाकली आणि तो विषय या पुढील काळामध्ये निबंधाचा विषय ठरला नाही तर नवलच आहे. तो विषय आहे *कोरोना शाप की वरदान*

*कोरोना शाप की वरदान* या विषयाचा विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने डोळ्यासमोर येते ती म्हणजे कोविड १९ या अदृश्य अतिसूक्ष्म विषाणूने मानवाला घरांमध्ये बंदिस्त करून ठेवले आणि विशेष म्हणजे हा लॉकडाऊन फक्त या सृष्टी वरील *मनुष्यप्राण्या* साठीच होता.

     निसर्गातील इतर सर्व सूक्ष्मजीव कीटक, किटाणू, पक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करत होते त्यांच्या दृष्टीने हा कोरोना वरदानच ठरला असेल. ज्या मनुष्याने निसर्गावर आक्रमण करत जंगलातील प्राण्यांची संख्या कमी केली केवळ हौसेसाठी, व्यापारासाठी त्यांची शिकार केली, निसर्गातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कमी करून सिमेंटची जंगले उभी केली, त्याच जंगलामध्ये covid-19 मुळे मनुष्यप्राणी बंदिस्त झाला.

       ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकसंख्येची झपाट्याने वाढ होत आहे पण मनुष्याला राहण्यायोग्य क्षेत्रफळ कधीही वाढणार नाही. मग अशावेळी आहे त्याच क्षेत्रफळामध्ये एवढी मोठी लोकसंख्या सामावून घेणे ही पुढील काळामध्ये प्रचंड जिकिरीची, समस्येची, संकटांना आमंत्रण देणारी गोष्ट होणार आहे.

*तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी* या उक्ती प्रमाणे मनुष्य पैसा, ऐषाराम, स्टेटस यांच्या मागे लागून स्वतःचे आरोग्य, कौटुंबिक सौख्य, सुख, समाधान, मानसिक शांती या सर्वांना गमावून बसला होता. covid-19  या विषाणूने जग हे वेगवान चाकाला खीळ बसावी तसे एका जागी अडकून राहीले. मग विचार सुरू झाला तो मानवाच्या अस्तित्वाचा. 

*आय थिंक देअर फोर आय अॅम* हा अस्तित्ववादाचा मूळ हेतू मनुष्याला स्वतःच्या जगण्याकडे पॉझिटिव्ह पाहायला शिकवत आहे. सर्वत्रच भितीचे, नकारात्मकतेचे वातावरण पसरलेले असताना स्वतःमधील सकारात्मकतेचा दिवा पेटवून नैराश्याला दूर करून आनंदी, सुखी, निरामय जीवन जगण्याची सहज सुंदर कला मनुष्याला या काळात शिकता आली.

*आमच्याजवळ वेळच नाही... आम्ही खूप बिझी आहोत....* असे म्हणणाऱ्यांना निवांतपणा, कमीत-कमी गरजांमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी कोणतीही पर्यटनवारी, परदेशवारी न करता स्वकष्टाने स्वतःच्या हाताने उभारलेल्या घरांमध्ये स्वतःच्या माणसांमध्ये पर्यटन स्थळ शोधण्याचे दृष्टी दिली.

आपल्या पुढील पिढ्यांना आपल्याला काही द्यायचे असेलच तर पैसा, स्थावर जंगम मालमत्ता यापेक्षाही स्वच्छ पाण्याचे स्त्रोत, हिरवा निसर्ग, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, निसर्गावर अतिक्रमण न करता निसर्ग हा मित्र आहे संतांच्या भाषेत सांगायचे झाले तर *वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती*... हा वारसा पुढील पिढीला आपल्या अनुकरणातून देणे ही काळाची गरज आहे.

माणुसकी, माणसाला माणसाप्रती असणारी संवेदना, सहवेदना यांचा वारसा पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमित झाला म्हणून मनुष्याला वाळीत न टाकता सोशल डिस्टंसिंग पाळत असताना समाजामध्ये परस्परांमध्ये अंतर वाढणार नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे आणि याच गोष्टीचा विचार करत असताना कोरोना या विषाणूने प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम केला असला तरी माणसामधील भावनिक-मानसिक अंतर कमी होऊ नये याचीही प्रचिती दिली. पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी ज्या पद्धतीने समाजसेवेचे व्रत घेऊन कार्य करत आहे ती समर्पणाची, सेवेची, भावना शालेय जीवनापासूनच बालपणापासूनच प्रत्येकामध्ये रुजावी हा आपला भारतीय संस्कार आहे. साने गुरुजींच्या भाषेत सांगायचे तर *खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे*.

 म्हणूनच *कोरोना शाप की वरदान* या विषयाचा विचार करत असताना पुढील काळामध्ये मनुष्याने निर्माण केलेल्या अशा मानवी संकटांना तोंड देण्यासाठी, खंबीरपणे उभे राहण्यासाठी मनुष्यजातीतील एकोपा खूप महत्त्वाचा आहे. या अदृश्य विषाणूशी लढण्यासाठी लसीकरण, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी औषधे निर्माण होतील परंतु प्रांतिक वाद, जातीयवाद, धार्मिकतेढ यासारख्या विषाणूवर मात करण्यासाठी कोरोना काळामध्ये मनुष्याने आत्मसात केलेली *जीवन कौशल्य* महत्त्वाची ठरणार आहे.

प्रा. विद्या संतोष होडे

(एम ए. एम एड.डीएसएम,बीजे-प्रिंट मीडिया )


 

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?